
मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजीर्डा ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडसाळी या नवीन घाट रस्त्याच्या जोडणी आणि मिसिंग लांबीच्या सर्वेक्षणासंदर्भात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत रस्त्याच्या कामासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
प्रकल्पाची सद्यस्थिती आणि आव्हाने
या प्रस्तावित रस्त्यामुळे काजीर्डा आणि पडसाळी ही दोन गावे जोडली जाऊन दळणवळण अत्यंत सोयीचे होईल. सध्या या रस्त्यावर साधारण तीन किलोमीटरची “मिसिंग लांबी” आहे, ज्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या कामाचा विस्तृत अहवाल ऑक्टोबर २०२५ पर्यंत अपेक्षित आहे.
या रस्त्यातील एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे पन्हाळा तालुक्यातील सुमारे ३०० मीटर लांबीचा रस्ता वनविभागाच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी रस्ते बांधणीसाठी वनविभागाच्या परवानग्या मिळवणे आवश्यक आहे. या परवानग्यांसाठी एका संबंधित कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात आली असून, परवानग्यांचे काम त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.
उपस्थित मान्यवर
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्याचे सचिव, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, सार्वजनिक बांधकाम विभाग कोकणचे अधीक्षक अभियंता एस.एन. राजभोज, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अमोल ओखणेकर, सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.



